येत्या २० जुलैला ‘तुला पाहते रे’चा शेवट

‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. सुरूवातीला साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर व सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेनं रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. त्यानंतर या मालिकेत टर्न अँड ट्विस्ट आले. विक्रांत सरंजामेचे लग्न झालं असल्याचं ईशाला समजतं. त्यानंतर लग्न होतं आणि ईशा हिच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं समोर येतं. विक्रांतच राजनंदिनीला मारतो अशा बऱ्याच गोष्टी मालिकेत घडताना पाहायला मिळाल्या. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मालिका सुरू झाली तेव्हाच मालिका जास्त भागांची नसणार असल्याचं बोललं गेलं होतं. त्यामुळे मालिकेची कथा तशीच रेखाटण्यात आली होती. आता मालिकेची कथा निर्णायक वळणावर येत अखेर येत्या २० जुलै रोजी समाप्त होईल असं समजतं आहे. मालिकेचा शेवटचा भाग २० जुलै रोजी प्रसारीत होईल आणि याच दिवशी विक्रांत-ईशाच्या कथेचा शेवट पहायला मिळेल.