रखडलेल्या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार अनोखे आंदोलन

शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भागात नाट्यगृहाचे रखडलेले बांधकाम जलद गतीने सुरू व्हावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या समस्या दिग्दर्शित करून नाट्याच्या सादरीकरणाच्या माध्यमातून जनतेपुढे मांडण्यात येणार असून, हा नाट्यप्रयोग लवकरच सादर होईल असा इशारा स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना दिलेल्या निवेदनात राणा चंदन यांनी या अनोख्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. विशेष म्हणजे आंदोलनाच्या नाट्यसंहितेची प्रतही त्यांनी निवेदनात जोडली आहे. यात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एकतरी नाट्यगृह असावे अशी घोषणा केली होती. त्यावेळी या नाट्यगृहाची बांधकाम किंमत दोन कोटींच्या घरात होती. राज्यशासनाकडून संपूर्ण निधीही नगर पालिकेच्या खात्यात जमा झाला होता तरीही आजपर्यंत हे नाट्यगृह तयार झालेले नाही.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे नाट्यगृह म्हणून ही इमारत भूमिका वठवणार आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे बांधकाम जलद गतीने व्हावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. शिवाय बांधकाम अचानक बंद झाल्याने बुलडाणा शहरातील कलावंत, साहित्यीकांमध्ये असंतोष आहे.
विशेष म्हणजे अर्धवट बांधकाम झालेल्या या नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा राज्यात आर. आर. पाटील गृहमंत्री असताना पार पडलेला आहे. मात्र त्यानंतर ही वास्तू अर्धवट स्थितीत पडलेली आहे. या नाट्यगृहाच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी व काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या अनोख्या आंदोलनाचा इशारा दिला.